पडो, झडो, मूल वाढो....आजकालच्या आया मुलांच्याबद्दल अतिदक्ष असतात

*पडो, झडो, मूल वाढो..*

आजकालच्या आया मुलांच्याबद्दल अतिदक्ष असतात, त्यांचे लहान निर्णय सुद्धा स्वतःच घेतात यामुळे मुले छोटे छोटे निर्णय घेण्यासही असमर्थ ठरत आहेत. 

उदाहरण द्यायचे तर सातवी आठवीतील मुलांनासुद्धा आया आज हात धरून रस्ता ओलांडून देतात, त्यात मुलगी असेल तर विचारूच नका. हायवे, किंवा अतिवर्दळीचा रस्ता मी समजू शकतो, पण लहान रस्त्यावरसुद्धा हीच स्थिती दिसते. ही  स्थिती साधारण मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, व श्रीमंत घरात प्रामुख्याने दिसत आहे.

मी माझ्या मुलीच्या मैत्रिणीला.. स्वराली... - तिच्या घरी सोडण्यासाठी गेलो, गाडी घराच्या विरुद्ध बाजूला उभी केली, ती गाडीतून उतरून रस्ता ओलांडून। जाण्याच्या तयारीत राहिली, परंतू रस्ता ओलांडणे तिला जमत नव्हते, व हा रस्ता ओलांडण्यासाठी तिला जवळपास 5-7 मिनिटे लागली. निरीक्षण करताना असे दिसले की, समोरून येणाऱ्या दोन चाकी व चार चाकी गाडीचा तिला अंदाज येत नव्हता, दूरवर गाडी असतानाही केवळ येणारी गाडी किती सेकंदात तिच्या जवळून जाईल हा अंदाज न ठरवता आल्यामुळे, ती बावचळून, आहे त्याच जागी उभी राहिली.

एकुलती एक असल्यामुळे तिची आई तिला खूप जपते. इतके की, सायकलसुद्धा बिल्डिंगच्या आवारातच फिरवायची, तसेच स्वरालीला साधे खरचटलेलेसुद्धा आईला चालत नाही, लगेच डॉक्टरकडे घेऊन जाते. यामुळे स्वराली सायकलवरून पडली, किंवा घरात तिला थोडेही लागले तरी, जोरजोरात रडते,  कारण तिच्यात सहनशीलतेचा अभाव उत्पन्न झाला आहे. पायात काटा गेला, बोटात सुई, किंवा टाचणी टोचली, हातापायाला खरचटले आणि जरासे रक्त दिसले तरी घरचे वातावरण गंभीर होते. या सर्व उदाहरणावरून आपण येणारी पिढी पंगू तर करत नाही ना? याचा सर्वांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे. 

लहानपणी मुले खेळताना पडली पाहिजेत, त्यातून त्यांना सहनशीलता येते, वेदनेचा दाह शमवण्याची सवय होते, तसेच संघर्ष करण्याची प्रेरणा मिळते. नाजुक मुले भविष्यात नाऊमेद, किव्वा अपयशी होण्याची शक्यता अधिक. संघर्षशक्ती कमी राहिल्यास भित्रेपणा वाढतो. याचे पर्यावसन म्हणजे पराधीन, परावलंबी जीवन जगण्याची वेळ येते. तसेच धाडसी निर्णय घेताना मन कचरते.

आजकालच्या मुलांना झाडावर चढून फळे काढता येत नाहीत, साधे घरातील माळ्यावर ठेवलेली वस्तुसुद्धा काढायला घाबरतात. उंच जागी चढताना आईच्याकडून धीर मिळत नाही. तर "पडशील", "घसरशील", "तुला जमणार नाही", "उतर, कुणालातरी बोलावून करूया", असे शब्द ऐकायला मिळतात. या मुलांच्या आया आणि बाप मुले मोठी झाली तरी मुलांच्या शाळेची बॅग शाळेला जाणाऱ्या रिक्षा किंवा व्हँनमध्ये पोहोचवून देतात, हे पाहिल्यावर मुलांची किव येते. आज सत्तरी ओलांडलेल्या आई वडिलांनी मुलांना संघर्ष शिकवला, परंतू तीच मुले आपल्या मुलांना तसा संघर्ष का शिकवत नाहीत, याचे नवल वाटते?

पाश्चिमात्य देशात मुले आपली सायकल (पंक्चर इ.) स्वतः दुरूस्त करतात, त्यांच्याकडे त्याचे किट असते, यात सर्व हत्यारे असतात, ज्याचा वापर मुले अगदी सहजतेने करतात.

नवीन पिढीतील मुलांना स्वावलंबी करणे, हेच खरे पालकत्व आहे. त्यांना शर्टाचे किव्वा ड्रेसचे बटन लावणे, इस्त्री करणे, आपापले कपडे धुणे, सकाळी उठल्यावर स्वतःची चादर घडी करून योग्य ठिकाणी ठेवणे, पुस्तकांना कव्हर लावणे, बूट पॉलिश करणे, सर्व चप्पल-बूट जोड नीट एक रेषेत ठेवणे, वेळप्रसंगी भांडी धुणे, कचरा साफ करणे हे आलेच पाहिजे. लाड खाण्यापिण्याचे करा, कामात लाड वर्ज्य आहे. 

स्वयंपाक खोलीत त्यांना मदतीला आवर्जून बोलवा, आठवड्यातून एकदा आई वडिलांच्यासाठी चहा बनवायला सांगा, दोन कप चहासाठी किती चहा साखर व दुध लागते याचा अंदाज स्वतः केल्याशिवाय त्यांना कधीच येणार नाही. हे करताना बऱ्याच वेळेस चटका ही लागतो, लागू दे!, ही जखम दोन दिवसांची असते, पण आयुष्यभराची शिकवण देऊन जाते, या व अश्या कामातून मुलांना जबाबदारी घेण्याची सवय होते, तसेच ही कामे खालच्या दर्जाची नसतात हे ही समजते. 

आजकाल एक वाक्य नेहेमी ऐकण्यात येते,*"मला जे कष्ट करावे लागले ते मुलांना करायला लागू नयेत"* इतकी मी धन दौलत करून, त्यांची सोय करून ठेवणार आहे. मुळात हा विचारच अधोगतिकडे घेऊन जाणारा आहे हे पालक विसरले आहेत. तुम्ही अपार कष्ट उपसले म्हणून धन संचय करू शकलात, तेच कष्ट तुमच्या मुलांना शिकवले नाहीत तर आहे ते धन ही तुमच्या नंतर संपून जाईल हेच याना समजत नाही. याच्या उलट अभ्यासासाठी मात्र मुलांवर हे पालक अतोनात जबरदस्ती करताना दिसतात. म्हणजे तुम्हाला बौद्धिक पातळी वाढवायची आहे, पण शारीरिक क्षमता घालवायची आहे हेच दिसून येते. 

लक्षात ठेवा, हे सर्व शिकवले नाही तर, नवीन पिढी कमजोर, कर्तृत्वहीन होईल. पालकांनो तुमचे विचार बदला, आपल्या वडीलधाऱ्यांनी नेहेमी सांगितले आहे, 
पडो, झडो, मूल वाढो, हे त्रिवार सत्य आहे.

Comments

Popular posts from this blog

म्हातारपण मजेत जाण्यासाठी

फेसबुक व अन्य सोशल मीडियाचा पुरेपूर पण सुरक्षित वापर करा हे महत्वाचं. नाहीतर बसा malluapp वर शोधत

जहर है फ्रिज का पानी